धाराशिव / पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रावर आधारित ऊस शेतीसाठी नॅचरल उद्योग समूहाने सर्वात मोठ्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. या प्रयोगाचा प्रारंभ रविवारी (ता.४) बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे (एडीटी) विश्वस्त व ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते होत आहे. दैनिक ‘ॲग्रोवन’ने याबाबत वृत्त दिले आहे.
‘नॅचरल शुगर ॲण्ड अलाइड इंडस्ट्री ज लिमिटेड’च्या साईनगर रांजणी (ता.कळंब, जि.धाराशिव) येथील युनिट क्रमांक एकमध्ये रविवारी (ता.४) सकाळी ११ वाजता या प्रकल्पाचा प्रारंभ होत आहे. नॅचरल उद्योग समूहाचे अध्यक्ष बी. बी. ठोंबठों रे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या सोहळ्यास एडीटीचे अध्यक्ष राजेंद्र पवार व मुख्य कार्यकारी नीलेश नलावडे यांच्यासह जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडू- पाटील उपस्थित राहणार आहेत.
नॅचरल शुगर’सह बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे (एडीटी), वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) व वेस्ट इंडियन शुगर असोसिएशनच्या (विस्मा) यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबविला जात असलेल्या या उपक्रमाबाबत उत्सुकता आहे.या प्रकल्पातील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राची जुळणी नियोजनबद्ध करण्याकरिता बारामती केव्हीके व व्हीएसआयने एक संयुक्त वॉररुमदेखील स्थापन केली आहे. ऊस लागवड, सिंचन व खत व्यवस्थापन, पीक संरक्षण तसेच हवामानावर आधारित नियोजनासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रकल्पात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या शेतकऱ्यांना नॅचरल शुगरकडून पारितोषिकेदेखील दिली जाणार आहेत. एआय आधारित ऊसशेतीसाठी एकत्रितपणे नियोजन करणारा देशातील हा पहिलाच साखर कारखाना ठरला आहे.
काय आहेत या प्रकल्पाची वैशिष्ट्ये…
‘एआय’ प्रकल्पात एकाचवेळी ७५३ शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात आले.
हवामान केंद्र आधारित २० ‘हब’ व संवेदक आधारित ५०० ‘स्पोक’ची उभारणी.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नॅचरल शुगरने ऊस विकास विभागांतर्गत स्वतंत्र कक्ष स्थापन.
या कक्षातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, निरीक्षण व मार्गदर्शन केले जाणार.
नॅचरल शुगर समूहाचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले कि, ऊस शेतीमुळे ग्रामीण भागाचे केलेले आर्थिक परिवर्तन वाखाणण्याजोगे आहे. आता कृषी क्षेत्राचे दूरदर्शी अभ्यासक प्रतापराव पवार यांच्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर या परिवर्तनाचा दुसरा टप्पा सुरू होतो आहे. यात ‘नॅचरल शुगर उद्योग समूह’ अग्रभागी असल्याचा अभिमान वाटतो.

















