सोलापूर : साखर कारखान्यांचे वजनकाटे तपासणीसाठी भरारी पथकाची स्थापना, पथकात १० सदस्यांचा समावेश

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील यंदाचा गळीत हंमाग अंतिम टप्यात आला असून आता जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील साखर कारखान्याचे वजनकाटे तपासणीसाठी भरारी पथक स्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत. या पथकामध्ये वैधमापन शास्त्र विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग व प्रादेशिक सहसंचालक (साखर) व साखर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला असून, त्यासाठी कार्यप्रणालीही निश्चित करण्यात आली आहे.

ऊस वजन काटा कॅलिब्रेशनमध्ये फेरफार करुन ऊस वजन काटामारी केली जात असल्याच्या अनेक तक्रारी विविध शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून प्रशासनाकडे येत होत्या. त्यासाठी ऊस वजनकाटा कॅलिब्रेशन करुन सील करणे आवश्यक आहे. संबंधित वैधमापन अधिकाऱ्याने वजनकाटयाची तपासणी करतेवेळी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन ऊस वजन काटे कॅलिब्रेशन झाल्यानंतर सील करावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. साखर कारखान्यांच्या वजनकाटे तपासणी संदर्भात भरारी पथकांमध्ये योग्य अशा शेतकरी प्रतिनिधीचा समावेश तहसिलदार यांनी करावा. तहसिलदार यांनी भरारी पथकातील सदस्यांचे नांव व संपर्क क्रमांक त्या त्या कार्यक्षेत्रातील साखर कारखाना व शेतकरी यांना उपलब्ध होईल अशा प्रकारे प्रसिद्ध करावेत. तसेच तालुकानिहाय पथकाचे नांव व संपर्क क्रमांक या कार्यालयास अवगत करावेत. भरारी पथकांनी केलेल्या कार्यवाहीबाबत दर पंधरवड्यास अहवाल सादर करावा, अशा सूचनाही प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

…यांचा असेल भरारी पथकात समावेश

प्रशासनाच्या वतीने स्थापन करण्यात येणाऱ्या भरारी पथकामध्ये त्या त्या तालुक्याचे तहसीलदार हे पथक प्रमुख असतील, वैध मापनशास्त्र विभागातील उपनियंत्रक हे सचिव, पोलिस ठाण्याचे अंमलदार सदस्य, पंढरपूर, सांगोला तालुक्यातील ए. एन. बचुटे हे सदस्य, विशेष लेखापरिक्षक सहकारी साखर संस्था हे सदस्य, माढा, माळशिरस तालुक्यातील उपलेखा परिक्षक ए. एस. म्याकलवार सदस्य, बार्शी, करमाळा तालुक्यातील लेखा परिक्षक एन. बी. ठोकळ, मोहोळ, मंगळवेढा लेखा परिक्षक मोरे, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील लेखा परिक्षक एस. आर. आडम, अक्कलकोट तालुक्यातील लेखा परिक्षक डी. के. मुदाळे, शेतकरी प्रतिनिधी हे सदस्य असणार आहेत.

…भरारी पथकाकडून अशी होईल कार्यवाही

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकाकडून जिल्ह्यातील साखर कारखान्यांना स्वयंस्फुर्तीने अचानक भेटी देऊन वजनकाट्यांची तपासणी करावी. जेणेकरून ऊसाच्या वजनासंदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रारीवर आळा बसेल. शेतकऱ्यांना वजनाची पावती योग्य प्रकारे देण्यात येते किंवा कसे याची खात्री करणे. एखाद्या साखर कारखान्याच्या बाबतीत ऊसाच्या वजनाबाबत गैरप्रकार होत असल्याची तक्रार यंत्रणेस किंवा पोलीसांकडे प्राप्त झाल्यावर लगेच त्या साखर कारखान्याच्या वजनकाट्याची तपासणी करावी आणि गैरप्रकार आढळल्यास यंत्रणेमार्फत योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. वजनकाट्याच्या तपासणीमध्ये काही गैर कायदेशीर बाबी आढळल्यास सर्व संबंधितावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना ही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here