सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे पिंपळनेर युनिट व करकंब युनिटमध्ये आतापर्यंत एकूण १५ लाख ७६ हजार १९६२ मे. टन गाळप झाले आहे. पिंपळनेर युनिटने ११ लाख ७४ हजार ३५९ मे. टन तर करकंब युनिटने चार लाख २ हजार ६०३ मे. टन गाळप केले आहे. कारखान्यातर्फे १ ते १० जानेवारी या दहा दिवसांचे प्रतीटन ३,०२५ रुपयांप्रमाणे पहिला हप्ता ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. या ऊस बिलापोटी कारखान्याने ५७ रुपये कोटी अदा केले आहेत अशी माहिती कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी आ. बबनराव शिंदे यांनी दिली. जिल्ह्यात १० जानेवारीअखेर ऊसबील देणारा विठ्ठलराव शिंदे कारखाना हा एकमेव असल्याची माहितीही त्यांनी दिली.
चालू गळीत हंगामात विठ्ठलराव शिंदे कारखान्याने आतापर्यंत, १० जानेवारीअखेर ऊस बिलासाठी एकूण ४२२ कोटी ४५ लाख अदा केले आहेत. कारखान्याने चालू हंगामात पिंपळनेर व करकंब युनिटकडे गाळपास ऊस पाठवलेल्या शेतकऱ्यांचे २१ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीतील उसाला यापूर्वी प्रती टन २८५० रुपयांप्रमाणे पहिला अॅडव्हान्स हप्ता देण्यात आला होता. नंतर उर्वरीत फरक दिला जात आहे. माजी आमदार शिंदे यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षांपासून कारखाना दर दहा दिवसाला शेतकऱ्यांची ऊस बिले देतो. शेतकऱ्यांना कारखान्याविषयी विश्वास वाटत असल्याने शेतकरी ऊस पाठवण्यास पसंती देत आहेत.
















