कोल्हापूर : अपुरी तोडणी यंत्रणा, ऊसतोड मजूर टोळ्यांची मनमानी यातून शेतकऱ्यांची राजरोस लुट सुरू आहे. एक एकराला पाच हजार रुपये असा दर पडला आहे, तसेच टोळ्यांना चिकन, मशीनवरील वाहनचालकास जेवण व २०० रुपये एन्ट्री द्यावी लागत आहे. भरलेले वाहन फडातून ओढून बाहेर काढण्यासाठी प्रत्येक खेपेस ट्रॅक्टरमालकास २५० रुपये मोजावे लागत आहेत. स्लिप बॉयची मनधरणी करणे भाग पडते आहे. शेतकऱ्यांची लुट सुरु असली तरी कारखाना प्रशासनाने मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
तोडणीसाठी शेतकऱ्यांना कारखान्याच्या गट कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. स्लिप बॉयची मनधरणी करावी लागत आहे. त्याच्याकडून तुम्ही टोळीला भेटा, यंत्रणा त्याच्या हातात आहे, असे सांगितले जाते. सध्या एक एकर ऊस तोडणीसाठी ३ ते ५ हजार रुपयांची मागणी होत आहे. टोळी तोडण्यास येण्यासाठी मुकादमाला मॅनेज करून ३०० ते ५०० रुपयांची खुशी द्यावी लागत आहे. हतबल झालेले शेतकरी हे पैसे मोजत आहेत. ही रक्कम देऊन टोळ्यांना चिकन द्यावे लागते. भरलेली वाहन फडातून बाहेर काढण्यासाठी ज्या वाहनमालकाची टोळी आहे, त्याचाच अथवा त्याच्या मर्जीतील ट्रॅक्टर सांगावा लागतो. या वाहनाला प्रत्येक खेपेस २५० रुपये द्यावे लागतात. ऊस कारखान्यास नेणाऱ्या मशीनच्या वाहनाच्या चालकास २०० रुपये एन्ट्री व जेवण द्यावे लागते.

















