कोल्हापूर : भोगावती सहकारी साखर कारखान्याने चालू हंगामातील १ ते १५ डिसेंबरअखेर गाळप झालेल्या उसाची बिले प्रतिटन ३६५३ रुपयांप्रमाणे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी दिली.कारखान्याने डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात गाळप झालेल्या ६६ हजार ५७८ मेट्रिक टन उसाच्या बिलापोटी २४ कोटी ३२ लाख १०,३१७ रुपये उत्पादकांच्या खात्यावर जमा केले आहेत.
यंदाच्या हंगामात कारखान्याने २९ जानेवारीअखेर ८० दिवसांत ३ लाख ४८ हजार ८४० टन ऊस गाळप करून ४ लाख २१ हजार ६३० क्विंटल साखर उत्पादित केली असून, सरासरी साखर उतारा १२.११ टक्के आहे. कारखान्याने यावर्षी जाहीर केलेला दर राज्यात उच्चांकी असून, यावर्षीच्या हंगामात सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित पूर्ण करण्यासाठी ऊस उत्पादकांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन पाटील व कवडे यांनी केले. यावेळी सर्व संचालक मंडळ सागर पाटील, संजय पाटील व अधिकारी उपस्थित होते.

















