जालना : तब्बल १४ वर्षे बंद असलेल्या देवगिरी साखर कारखान्याचे ५ फेब्रुवारी रोजी बॉयलर अग्निप्रदीपन झाले. कारखान्याचे चेअरमन कल्याणराव चव्हाण व त्यांच्या पत्नी पद्मा चव्हाण यांच्या हस्ते विधिवत होम हवन करून हा बॉयलर पेटवला. गेल्या अनेक वर्षांपासून कारखाना पूर्णपणे बंद असल्याने यात जवळपास मशिनरी व १७५ मोठमोठे विद्युत पंप चोरीस गेले होते. कारखान्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांचे कर्ज होते. त्यामुळे हा कारखाना बँकेच्या ताब्यात होता. आमदार अनुराधा चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक प्रसंगी कारखाना सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी व अभियंता अतुल चव्हाण यांनी कारखान्यावर प्रशासकीय त्रिसदस्यीय संचालक मंडळ आणले. राज्य सरकारची मदत घेऊन हा कारखाना चालविण्याची परवानगी मिळवली.
आमदार अनुराधा चव्हाण, अतुल चव्हाण, प्रशासकीय संचालक नितीन देशमुख, योगेश मिसाळ, बाळासाहेब सोटम, ज्ञानेश्वर जाधव, मधुकरराव मुळे, निखिल चव्हाण, विजय मोरे, वाल्मिक जाधव आदी उपस्थित होते. कारखाना चालू व्हावा अशी फक्त अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र त्याचा परिणाम इतर कारखान्यांवर होऊ शकतो म्हणून कारखाना बंद ठेवण्याचे प्रयत्न झाले असा आरोप शेतकऱ्यांचा आहे. आमदार चव्हाण व अतुल चव्हाण यांनी स्व. अजित पवार यांचे मावसभाऊ नितीन देशमुख यांना बरोबर घेऊन कारखाना सुरू केला. कारखान्याच्या मालकीची सावंगी येथील जमीन समृद्धी महामार्गाच्या कामात गेली. त्याचा सुमारे ३० ते ३२ कोटी रुपये मोबदला मिळाला. यातून कर्ज फेड व इतर देणे घेणे आदी कामे झाली. त्याचा खूप मोठा फायदा झाला.


















