सातारा : येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने ७ हजार ५०० मेट्रिक टनावरून अकरा हजार मेट्रिक टनापर्यंत गाळप करण्यासाठी नवीन विस्तारवाढ प्रकल्प नुकताच कार्यान्वित केला. या प्रकल्पातून नुकतेच दैनंदिन १० हजार २०० मेट्रिक टनाचे गाळप केले आहे. टप्प्याटप्याने नवीन विस्तारवाढ प्रकल्पातील यंत्रणांचा वापर करून अकरा हजार मेट्रिक टन व त्यापेक्षा जास्त गाळप करण्यात येईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
अध्यक्ष पाटील म्हणाले, सह्याद्री कारखान्याच्या नवीन विस्तारवाढ प्रकल्पाला राजकीय, नैसर्गिक आणि तांत्रिक अडचणी आल्या. मात्र, त्या अडचणींवर मात करून ‘सह्याद्री’ने विस्तारवाढ पूर्ण केली. गेल्या आठ दिवसांपूर्वीच हा नवीन विस्तारवाढ प्रकल्प कार्यान्वित केला असून, आज प्रतिदिन १० हजार २०० मेट्रिक टनाचे गाळप केले आहे. दैनंदिन गाळप क्षमतेस पुरेल एवढी ऊसतोडणी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. नोंदविलेला संपूर्ण ऊस गाळपास पाठवावा, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.
















