सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील नऊ कारखान्यांचा गळीत हंगाम बंद झाला आहे. उर्वरित कारखान्यांपैकी अपवाद वगळता इतर कारखान्यांचा येत्या २० तारखेपर्यंत गाळप बंद होण्याची शक्यता आहे. गत हंगामात शेतकऱ्यांच्या पैशाला लांबण लावणाऱ्या कारखान्यांना यंदाच्या हंगामात ऊस मिळवताना मोठी अडचण आली. या कारखान्यांचा शंभर दिवसांतच गाळप हंगाम आटोपल्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
माळशिरस तालुक्यातील सहकार महर्षी, शंकर सहकारी यासह ओंकार शुगर चांदापुरी या कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातीलही काही कारखाने बंद झाले आहेत. जिल्ह्यातील उर्वरित सुरू असलेले साखर कारखानेही येत्या दहा ते पंधरा दिवसात बंद होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात भीमा सहकारी, युटोपियन शुगर, भैरवनाथ शुगर विहाळ व आलेगाव, सिद्धनाथ शुगर, सहकार महर्षी, शंकर सहकार कारखाना, ओंकार शुगर (चांदापुरी), धाराशिव शुगर (सांगोला) या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. शेतकऱ्यांना आर आपल्या ऊस बिलांची प्रतीक्षा आहे.

















