बीड : ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत १५९ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून मुलींचे सहा तर मुलांच्या पाच वसतिगृहांच्या इमारतीचा समावेश आहे. प्रत्येक वसतिगृहाची क्षमता १०० विद्यार्थ्यांची असेल. इमारतींच्या बांधकामासाठी जागा उपलब्ध झाल्यानंतर आता शासनाने या कामासाठी निधी जारी केला आहे. गेवराई, माजलगाव, धारूर, केज, अंबाजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, वडवणी, बीड येथे मुले आणि मुलींच्या वसतिगृहांना जागा उपलब्ध झाली आहे. सध्या काही ठिकाणी भाड्याच्या इमारतीमध्ये वसतिगृह चालविले जातात.
याबाबत, राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने याबाबतचा आदेश जारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. जून २०२१ च्या मंत्रिमंडळ बैठकीत ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी संत भगवान बाबा वसतीगृह योजनेला मंजूरी देण्यात आली. साडेचार वर्षांपासून यासाठी जागा उपलब्ध झाली नव्हती. जिल्ह्यातील १९ ठिकाणी वसतिगृह उभारणीसाठी प्रत्येक ठिकाणी मुलांचे वसतिगृह, माजलगाव दोन एकर जागा जिल्हा प्रशासनाने सामाजिक न्याय विभागाला उपलब्ध करून दिली. प्रत्येक वसतिगृहाची क्षमता १०० विद्यार्थी एवढी आहे. ११ वसतिगृहांच्या उभारणीमुळे ११०० विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शिक्षणासाठी शहरात राहणे, खाणे याची मोफत सोय असेल.














