पुणे : येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या जमिनीच्या संरक्षणासाठी प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलत कारखान्याच्या हद्दी अधिकृतपणे निश्चित करून सिमेंटचे खांब रोवले. कारखाना अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष कैलास गावडे आदींच्या उपस्थितीमध्ये ही प्रक्रिया पार पडली. अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. यावेळी संचालक शिवाजी निंबाळकर, अनिल काटे, निलेश टिळेकर, सतीश देवकाते, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
याबाबत बोलताना कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक म्हणाले कि, कारखान्याची मालमत्ता ही सभासदांची आणि संस्थेची महत्त्वाची संपत्ती आहे. या जागेचे संरक्षण करणे आणि तिचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. या प्रक्रियेमुळे कारखान्याच्या जागेवर होणारी संभाव्य अतिक्रमणे रोखण्यास मदत होईल. साखर कारखाना, ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांच्या हितासाठी नेहमीच प्राधान्य राहील.


















