कोल्हापूर : आजरा येथील वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे गळीत हंगामाची उत्साहात सांगता झाली. १०५ दिवस हंगाम झाला. ३ लाख ६ हजार ८८० मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. सरासरी टक्के ११.८४ टक्के साखर उतारा मिळाला आहे. ३ लाख ६३ हजार पोत्यांचे उत्पादन झाले. अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांच्या हस्ते साखर पोत्याचे पूजन झाले. संचालक काशीनाथ तेली व स्मिता तेली यांच्या हस्ते पूजा झाली.
अध्यक्ष देसाई म्हणाले, ‘यंदा कारखाना कार्यक्षेत्रातून १ लाख ६८ हजार २७५ मेट्रिक टन तर कार्यक्षेत्राबाहेरील गडहिंग्लज, चंदगड, आंबोली १ लाख ३८ हजार ६०५ मेट्रिक टन ऊस गाळपासाठी आला. सततच्या पावसामुळे ऊस पिकावर परिणाम झाला. ऊस उत्पादन चाळीस टक्क्यांनी घसरले. साखर उताऱ्यावरही त्याचा परिणाम झाला. पर जिल्ह्यातील पुरेशी ऊस तोडणी यंत्रणा उपलब्ध झाली नाही. याचा ऊसपुरवठ्यावर परिणाम झाला. व्यवस्थापनाच्या काटेकोर नियोजनामुळे तीन लाखांवर गाळप झाले.
प्रतिकूल परिस्थितीत कारखान्याचे संचालक मंडळाने योग्य निर्णय घेतले समाधानकारक कामगिरी केली. आगामी गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी काटेकोर नियोजन केले जाईल. उपाध्यक्ष, संचालक, कार्यकारी संचालक, सर्व विभागप्रमुख, कामगार संघटना, शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार, व्यापारी, अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले. उपाध्यक्ष सुभाष देसाई, संचालक मधुकर देसाई, दीपक देसाई, रणजित देसाई, शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरुकटे, रचना होलम, मनीषा देसाई, हरीभाऊ कांबळे, नामदेव नार्वेकर, दिगंबर देसाई, कार्यकारी संचालक एस. के. सावंत, जनरल मॅनेंजर (टेक्नि.) एम. आर. पाटील, चिफ अकौंटंट, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.


















