सातारा : ऊस उत्पादनवाढ, आर्थिक शिस्त आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची सर्वांगीण प्रगती झाली आहे. यंदाच्या हंगामात कारखान्याने इतिहासातील विक्रमी, १४ लाख १९ हजार ३०८ टन उसाचे गाळप केले आहे. यावर्षी शेतकरी सभासद, ऊस तोडणी वाहतूकदार, कंत्राटदारांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडला. कारखान्याचा ऊस तोडणी, वाहतूक खर्चाचा एकही रुपया बुडाला नाही अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कारखान्याच्या ६६ व्या गळीत हंगामाची सांगता समारंभात ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले व आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
उच्चांकी गाळपाबद्दल कडेगाव येथील शेतकरी सभासद ब्रिजराज मोहिते, संपत माने, अंकुश यादव, अर्जुन पवार, सचिन कदम यांनी अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांचा सत्कार केला. संचालक अविनाश खरात, त्यांच्या पत्नी शारदा खरात यांच्या हस्ते गळीत हंगाम समाप्तीनिमित्त सत्यनारायण पूजा झाली. गळीत हंगाम यशस्वितेसाठी परिश्रम घेतलेल्या ऊसतोडणी, वाहतूकदार, प्रमुख अधिकारी, शेती विभागाच्या कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. विजय कणसे, डॉ. सचिन पवार, स्पर्धा परीक्षेत उज्वल यश मिळवल्याबद्दल आरती पवार, प्रथमेश पवार, जीवन पवार यांचाही सत्कार करण्यात आला. संचालक बाबासो शिंदे यांनी आभार मानले. पाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक धोंडिराम जाधव, निवासराव थोरात, बाबासो शिंदे, बाजीराव निकम आदी उपस्थित होते.


















