धाराशिव : एनव्हीपी शुगर प्रा.लि. या गूळ पावडर कारखान्याने अवघ्या ११९ दिवसांत तब्बल १ लाख १८ हजार मे. टन ऊस यशस्विरीत्या गाळप केले आहे. कारखान्याचे मार्गदर्शक आप्पासाहेब पाटील तसेच सर्व खातेप्रमुख, तोडणी वाहतूक ठेकेदार, कर्मचारी यांच्या हस्ते गव्हाण पूजन करून गळीत हंगामाची सांगता करण्यात आली. शुक्रवारी झालेल्या या दुसऱ्या गळीत हंगामाच्या सांगता प्रसंगी याप्रसंगी जागजी येथील प्रगतशील शेतकरी राजाभाऊ देशमुख, मुख्य शेतकी अधिकारी जयवंत रोहिले, चिफ इंजिनिअर ओंकार मोकाशे, चिफ केमिस्ट उमेश बिक्कड, मिल फोरमन प्रवीण पाटील, विजय वाघे, अमर पुंड, सेल्स ऑफिसर सागर शिंदे, परचेस अधिकारी रविकांत जोगदंड, प्रविण यादव, अजय गाडे, लेबर ऑफिसर शुभम सावंत आदी उपस्थित होते.
‘एनव्हीपी शुगर’ने चेअरमन नानासाहेब ऊर्फ बालाजी पाटील यांच्या कुशल नियोजनामुळे अवघ्या ११९ दिवसांत गळीत हंगामात १ लाख १८ हजार मे. टन गाळप यशस्वीपणे पूर्ण केले. शेतकऱ्यांनी गाळपासाठी ऊस दिल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात म्हणजेच दर महिन्याच्या १ व १६ तारखेस संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात ऊसबिल जमा करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेला आहे असे सांगण्यात आले. गळीत हंगामात कारखाना कार्यक्षेत्रातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यातूनही गाळप यशस्वी झाल्याची माहिती देण्यात आली. यावेळी हार्वेस्टर मालक हेमंत देशमुख, वाहतूक ठेकेदार पद्माकर शिंदे, किरण कुन्हाडे, नवनाथ तोंडे, रामभाऊ मिसाळ, शिवाजी सुरवसे, शेतकी विभागाचे राजाभाऊ केवळराम, संभाजी चोरमले, अक्षय माने, बालाजी गुळवे आदी उपस्थित होते.

















