सातारा : ऊस पिकामध्ये नव्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने पुढाकार घेतला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हा प्रकल्प राबविण्यासाठी ऊस उत्पादकांना अर्थसाहाय्य करीत आहे. कमी उत्पादन खर्चात जास्त ऊस उत्पादन घेण्यासाठी एआय तंत्रज्ञान फायदेशीर आहे, असे मत कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी केले. खटाव तालुक्यातील चोराडे येथे उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पाच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. चेअरमन पाटील यांनी व्हीएसआय पुणे आणि केव्हीके बारामतीच्या शास्त्रज्ञांसमवेत या केंद्राला भेट देऊन पाहणी केली.
चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुण्याची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र यांच्या सहयोगाने, पूर्व हंगाम व सुरू ऊस लागण क्षेत्रामध्ये एकरी १०० टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी केंद्र उभारण्यात आले आहे. त्याची पाहणी करण्यात आली. याप्रसंगी कारखान्याचे संचालक संतोष घार्गे, माजी संचालक लालासाहेब पाटील, पै.संजय थोरात, सुरेशराव पाटील, पै. तुषार माने, पै. उदय गुरव, निवास पवार, पत्रकार तुषार माने, विजय पवार, योगेश शिंदे, अरविंद शिंदे, अविनाश घार्गे, संजयकुमार घार्गे, अशोक कदम, कमलाकर घार्गे, विजय जाधव, प्रकाश शिंदे, संजय पाटील, व्हीएसआयचे शास्त्रज्ञ डॉ. समाधान सुरवसे, के. व्ही. के. बारामतीचे शास्त्रज्ञ आकाश वळकुंडे, नितीन शिंदे, अरुण पडवळ, ऊस विकास अधिकारी संजय चव्हाण, चोराडे गावचे माजी सरपंच सुहास पिसाळ, कृष्णत पिसाळ आदी उपस्थित होते.


















