पुणे : राज्यात हळुहळू पारा वाढू लागला आहे. तापमान ३२ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत जात असल्याचा परिणाम विविध पिकांवर होत आहे. ऊस पिकाच्या वाढीवर आणि फुटव्यांवरही याचा परिणाम दिसून येत आहे. तापमान वाढल्याने माती गरम होते आणि मुळांची वाढ खुंटते. कडक उन्हामुळे उसाची पाने पिवळी पडून उत्पादन घटते. त्यामुळे ऊस पिकात पाचट किंवा सेंद्रिय अच्छादन फायदेशीर ठरते असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
तज्ज्ञांच्या मते, शेतकऱ्यांनी ह्युमिक अॅसिड व अॅसिटोबॅक्टरची फवारणी केल्याचा ऊस पिकाला फायदा होतो. त्यामुळे जमिनीतील सुक्ष्म जिवाणूंची वाढ होऊन पिक सुधारते. तसेच उन्हाळ्यात उसाला नियमित पाणी देणे गरजेचे असते. कमी पाणी असेल तर ठिबक सिंचन फायदेशीर ठरते. उसाला चांगले फुटवे येण्यासाठी नत्र, स्पुरद व पालाश खते शिफारशीनुसार द्यावीत. म्युरेट ऑफ पोटॅशची फवारणी केल्यास पिकाला फायदा होतो. त्यामुळे पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले. कडक उन्हात एमओपी किंवा केवोलीनची फवारणी केल्यास बाष्पीभवन कमी होते. यांसह विविध उपाययोजनांवर शेतकऱ्यांनी भर द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


















