कोल्हापूर : देशांतर्गत साखर बाजारात सध्या दरांमध्ये संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. अनेक साखर कारखान्यांचे गाळप हंगाम संपत आल्याने बाजारातील साखरेची उपलब्धता कमी होऊ शकते. सध्या सुरू असलेल्या रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर साखरेची मागणी मजबूत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात साखरेच्या दरांत तेजीचा कल कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विविध राज्यांतील साखरेच्या बाजारपेठेत एस- ३० आणि एम- ३० साखरेच्या दरांमध्ये बहुतांशी स्थिरता असून, काही भागांत किरकोळ तेजी नोंदवली जात आहे.
दरम्यान, केंद्राने मार्चसाठी २२.५ लाख टनांचा साखर कोटा जाहीर केला आहे. फेब्रुवारी २०२६ च्या तुलनेत काही राज्यांचा कोटा वाढवला असून, काही प्रमुख साखर उत्पादक राज्यांचा कोटा घटवला आहे. राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन असलेल्या उत्तर प्रदेशला मार्चमध्ये ७ लाख ५५ हजार १९६ टन कोटा देण्यात आला असून, महाराष्ट्राचा साखर कोटा मात्र घटून ८ लाख १२ हजार १९८ टनांवर आला आहे.













