कोल्हापूर : महाराष्ट्रात 2025–26 चा ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यातील 210 साखर कारखान्यांपैकी 154 कारखान्यांनी आपले गाळप बंद केले आहे. 12 मार्च 2026 पर्यंत राज्यातील एकूण साखर उत्पादन 981.58 लाख क्विंटलपर्यंत पोहोचले आहे. ही माहिती आयुक्तालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीतून समोर आली आहे. आतापर्यंत 210 कारखान्यांनी एकूण 1036.96 लाख मेट्रिक टन (LMT) उसाचे गाळप केले असून त्यातून 981.58 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
सध्या सरासरी साखर उतारा 9.47 टक्के आहे. 210 कारखान्यांपैकी 103 सहकारी क्षेत्रातील असून 107 खासगी क्षेत्रातील आहेत. साखर उत्पादन आणि उतारा या दोन्ही बाबतीत आतापर्यंत कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे आणि या विभागातील सर्व कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. मागील हंगामात याच कालावधीत 199 कारखान्यांनी गाळप सुरू केले होते आणि 841.88 LMT उसाचे गाळप झाले होते. त्यावेळी सरासरी साखर उतारा 9.43 टक्के होता. मागील हंगामात याच काळात 167 साखर कारखान्यांनी गाळप बंद केले होते.
कोल्हापूर विभागातील 39 पैकी सर्व कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. या कारखान्यांनी 209.86 LMT उसाचे गाळप करून राज्यातील सर्वाधिक 11.01 टक्के उतारा नोंदवला आहे. यामुळे 231.07 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. पुणे विभागातील 32 पैकी 22 कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. या कारखान्यांनी 223.94 LMT उसाचे गाळप केले असून साखर उतारा 9.84 टक्के राहिला आहे. यामधून 220.34 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
सोलापूर विभागातील 49 पैकी 37 कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. या कारखान्यांनी 219.82 LMT उसाचे गाळप केले असून साखर उतारा 8.59 टक्के नोंदवला आहे. अहिल्यानगर विभाग उस गाळपात चौथ्या क्रमांकावर आहे. येथील कारखान्यांनी आतापर्यंत 125.18 लाख टन उसाचे गाळप करून 113.66 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागातील साखर उतारा 9.08 टक्के आहे. येथे 28 पैकी 26 कारखाने बंद झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर विभागात आतापर्यंत 119.13 लाख टन उसाचे गाळप होऊन 97.74 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. येथे साखर उतारा 8.02 टक्के आहे.या विभागातील 25 पैकी 9 कारखाने बंद झाले असून काही कारखान्यांचा हंगाम पुढील आठवड्यात संपण्याची शक्यता आहे.नांदेड विभागात 124.49 लाख टन उसाचे गाळप करून 117.05 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. या विभागाचा साखर उतारा 9.4 टक्के आहे. येथे 30 पैकी 18 कारखाने बंद झाले आहेत.
अमरावती विभागात 11.99 लाख टन उसाचे गाळप करून 11.22 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. येथे साखर उतारा 9.36 टक्के आहे. या विभागातील 4 पैकी 1 कारखान्याचा गाळप हंगाम संपला आहे. नागपूर विभागात 1.95 लाख टन उसाचे गाळप झाले असून 0.81 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. या विभागातील साखर उतारा 4.15 टक्के आहे. येथे 3 पैकी 2 कारखाने बंद झाले आहेत.


















