पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात दमदार कामगिरी केली आहे. कारखान्याने बुधवार (दि. १८) अखेर १२ लाख ७४ हजार टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला. कारखान्याने १५ लाख १८ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. कारखान्याने सरासरी ११.९७ टक्के साखर उताऱ्यासह पुणे जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. दररोज ९,५०० मे. टन ऊस गाळप सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक सहकारी व खासगी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम बंद झाला असतानाही सद्यस्थितीत सोमेश्वर कारखाना अखेरच्या टप्प्यापर्यंत सक्षमपणे सुरू आहे.
सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने ऊसतोड कामगार पहाटेपासूनच कामाला लागले असून, सकाळच्या सत्रात कारखाना परिसरात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी दिसून येत आहे. पुढील आठवड्यात हंगाम समाप्त होण्याची शक्यता आहे. हंगामाच्या प्रारंभी कारखान्याने साडेतेरा ते १४ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले होते. अपवाद वगळता बहुतेक सभासद शेतकऱ्यांनी इतर कारखान्यांकडे ऊस न घेता सोमेश्वरलाच ऊसपुरवठा केल्याने हे उद्दिष्ट पूर्णत्वास जाणार आहे. संचालक मंडळाच्या योग्य नियोजनामुळे आणि शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे यंदा १३ लाख टन गाळपाचा टप्पा सहज पार होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


















