नवी दिल्ली : भारतीय नागरिक आता आपल्या आरोग्याविषयी सजग झाले आहेत. एका सर्वेक्षणात ही माहिती उघड झाली आहे. सल्लागार कंपनी इवाय इंडियाने केलेल्या सर्व्हेनुसार भारतातील ग्राहक आरोग्य आणि तंदुरुस्तीबाबतच्या घटकांवर अधिक खर्च करण्यास तयार झाले आहेत.
सर्वेक्षणात म्हटले आहे की, कोविड महामारीनंतर आलेल्या बदलाने आता भारतीय ग्राहक आता नैसर्गिक आहार, पूरक आहार आणि खास खाण्यापिण्यावर जोर देत आहेत. कोविड १९ महामारीनंतर आरोग्यासाठी लोकांमध्ये जनजागृती झाली आहे. ८२ टक्के लोक आपल्या कुटुंबाच्या आरोग्याबाबत चिंतीत आहेत. ही जागतिक स्तरावरील आकडेवारी आहे. तर भारतात हा आकडा ९४ टक्के आहे. ईवायच्या म्हणण्यानुसार, कोविडमुळे आयुष्यात झालेला बदल कायम राहील असे ५२ टक्के लोकांनी म्हटले आहे. जागतिक स्तरावर फक्त ३९ टक्के लोकांची अशी भूमिका आहे. ईवाय इंडियाचे राष्ट्रीय प्रमुख अंशुमन भट्टाचार्य यांनी सांगितले की, काही लोक याकडे अल्पकालीक घटनेच्या रुपात पाहतात. मात्र, व्यक्तीगत स्वच्छता, आरोग्य, तंदुरुस्ती, पोषण या बाबींना प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे.














