उसाला येणारा तुरा टाळण्यासाठी पाणी पातळी नियंत्रणाचा कृषी तज्ज्ञांचा सल्ला

ऊस पिकामध्ये पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात नायट्रोजनची कमतरता निर्माण झाली, तर मोठ्या प्रमाणात तुरा येतो. तसेच ज्यावर्षी ऊस पिकाखालील क्षेत्र वाढते, त्याच वर्षी उसाला तुरा येण्याचे प्रमाण अधिक आढळून येते, असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तज्ज्ञांच्या मते, उसाच्या सर्व जातींमध्ये तुरा येण्याची क्षमता असते. परंतु तुरा येण्याच्या कालावधीत फरक पडतो. म्हणजेच तुरा येण्याचे प्रमाण उसाच्या आनुवंशिक गुणधर्मावर अवलंबून असते. उसाच्या लवकर तुरा येणाऱ्या जातींमध्ये को ७२१९, को सौ. ६७१, को ९४०१२, को एम. ११०१५ तर मध्यम कालावधीत तुरा येणाऱ्या जातींमध्ये को ७१२५, को ८६०३२, फुले अस १५०१२, फुले ऊस १५००६ या वाणांचा समावेश आहे. सर्वात उशिरा तुरा येणाऱ्या जातीमध्ये फुले ऊस १३००७ चा समावेश आहे, अशी माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली आहे.

ॲग्रोवनमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रातील डॉ. कैलास भोईटे, डॉ. राजेंद्र भिलारे यांच्या मते उसाला येणारा तुरा टाळायचा असेल तर जमिनीतील पाणी पातळी नियंत्रित ठेवणे, हंगामानुसार योग्य वेळी उसाची लागवड करणे आवश्यक आहे. उसाच्या सर्व जातींमध्ये तुरा येण्याची क्षमता असते. परंतु तुरा येण्याच्या कालावधीत फरक पडतो. तुरा येण्याच्या क्रियेवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये अति पाऊस किंवा पाणथळ जमीन, प्रकाश कालावधी आणि तापमान, नत्राचे प्रमाण यांचा समावेश आहे. पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात नायट्रोजनची कमतरता निर्माण झाली तर मोठ्या प्रमाणात तुरा येतो. मात्र पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात पाण्याचा ताण पडला तर तुरा येण्याचे प्रमाण कमी राहते. लागण उसापेक्षा खोडवा उसामध्ये तुरा येण्याचे प्रमाण जास्त असते. सुरू, पूर्वहंगाम आणि आडसाली असा कोणताही लागण हंगाम असला तरी ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात उसाला तुरा येतो. मात्र, तुरा आल्यावर सर्वसाधारणपणे दीड ते दोन महिन्यांपर्यंत ऊस उत्पादनात जास्त घट येत नाही असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here