अहिल्यानगर : देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणातील दहा संशयित आरोपींना दिलेला अटकपूर्व जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी रद्द केला आहे. कारखान्याच्या विक्रीत अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पारनेर बचाव समितीच्या पाठपुराव्यामुळे न्यायालयाने क्रांती शुगर या खाजगी कंपनीचे चेअरमन ज्ञानेश नवले, संचालक पांडुरंग नवले, दत्तात्रय नवले, भिकू नवले, जालिंदर नवले, गुलाब नवले, शिवराज नवले, श्रीधर नवले, निवृत्ती नवले आदींवर पारनेर न्यायालयाच्या आदेशानंतर क्रांती शुगर कंपनीवर गुन्हा दाखल झाला होता.
सत्र न्यायालयाने आरोपींना काही अटींवर अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. याबाबत, पारनेर कारखाना बचाव समितीचे ॲड. रामदास घावटे यांनी सांगितले की, न्यायालयाने घातलेल्या अटी – शर्तीचा भंग केल्याचा प्रकार लक्षात येताच पारनेर कारखाना बचाव समितीने आरोपींचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश लोणे यांच्यासमोर झाली. कारखाना बचाव समितीची बाजू ॲड. रामदास घावटे, ॲड. सुदाम साठे, ॲड. उन्मेश चौधरी यांनी, ॲड. सोमनाथ गोपाळे मांडली. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत अटकपूर्व जामीन जामीन न्यायालयाने रद्द केला आहे. आरोपींना तातडीने अटक करून पुढील तपासाचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

















