अहिल्यानगर : अगस्ती सहकारी साखर कारखाना सध्या अडचणीत आहे. कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उसाचे पेमेंट, कामगारांचे पेमेंट व पुढील गळीत सुरू करण्यासाठी नियोजन हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यामुळे अगस्ती कारखान्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येणे आवश्यक आहे, अशी भावना सभासद, शेतकऱ्यांची आहे. आमदार डॉ. किरण लहामटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असून, त्यांनी ‘अगस्ती’चे अध्यक्षपद स्वीकारून अगस्ती कारखाना उर्जितावस्थेत आणावा, असे आवाहन लहामटे यांचे विरोधक माजी आमदार वैभव पिचड, बी. जे. देशमुख आदींनी केले आहे. त्यासाठी पाठिंबाही देण्याचे मान्य केले आहे.
अकोले तालुक्यात सध्या तालुका एज्युकेशन संस्थेविरोधात गदारोळ सुरू आहे. ही संस्था खासगी होऊ देणार नाही, अशी भूमिका आमदार डॉ. किरण लहामटे यांनी घेतली. त्यावर माजी आमदार व विश्वस्त वैभव पिचड यांनीही पत्रकार परिषद घेऊन तालुका एज्युकेशन संस्था ही संपूर्ण तालुक्याची आहे, तालुक्याचीच राहणार असल्याचे स्पष्ट करून विरोधकांनी केवळ व्यक्तीद्वेष व राजकारण करू नये, असे म्हटले आहे. माकपचे डॉ. अजित नवले, राष्ट्रवादीचे अमित भांगरे, सुरेश गडाख, सुरेश खांडगे, कारभारी उगले यांनी संस्थेत जाऊन साधक-बाधक बैठक घेतली. संस्थेचे पदाधिकारी व संचालक उपस्थित राहून गैरसमज दूर करण्यात आले. त्यानंतर डॉ. अजित नवले व अमित भांगरे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली आहे. मात्र, आमदार डॉ. किरण लहामटे यांनी संस्थेच्या सभासदांना आमंत्रित करून बैठक घेत घटनेतील बदल व संस्थेचे खासगीकरण होऊ न देण्याची भूमिका घेतली आहे. तर तालुक्याची भाग्यलक्ष्मी असलेला कारखाना वाचविण्यासाठी आजी-माजी आमदारांनी पुढे यावे, असे शेतकरी, सभासदांना वाटत आहे.