अहिल्यानगर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाचे वजन ज्या-त्या कारखान्याच्या वजन काट्यावर करण्याची सक्ती केली जाते. याऐवजी उसाचे वजन खासगी काट्यावर करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा डमाळे-पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. मुख्यमंत्री फडवणीस यांनी उसाचा काटा मारणाऱ्या कारखान्यावर कारवाई करण्याची केलेली घोषणा स्वागतार्ह आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही खासगी काट्यावर स्वखर्चाने ऊस वजन करू देण्याचे स्वातंत्र्य व मुभा मिळाल्यास शेतकऱ्यांना याचा फायदा होईल व पारदर्शकता येईल, असे डमाळे-पाटील यांनी म्हटले आहे.
याबाबत निवेदनात म्हटले आहे की, कोपरगावसह येवला, सिन्नर, निफाड, वैजापूर या भागातून संजीवनी व कोळपेवाडीला ऊस जातो. इतर कारखान्यापेक्षा संजीवनी, कोळपेवाडी उसाला कमी भाव देतात. त्यांचे उपपदार्थ निर्मितीचे अनेक उपक्रम असून त्याचा हिशेब शेतकऱ्यांना दिला जात नाही. नफ्यातील हिस्सा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. उसाचा काटा मारणाऱ्या कारखान्यांची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा व मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. जे शेतकरी उसाने भरलेल्या गाडीचे वजन खासगी काट्यावर करण्याचा प्रयत्न करतात, त्यांची तक्रार केली जाते. संबंधित शेतकऱ्याला अक्षरशः वाळीत टाकले जाते. शेतकऱ्यांसोबत करार केला जातो, मात्र तो वाचून दाखवला जात नाही असे निवेदनात म्हटले आहे.