अहिल्यानगर : अहिल्यानगर विभागातील २७ साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामात ९ फेब्रुवारीपर्यंत ११४ लाख टन ऊस गाळप केले आहे. जिल्ह्यासह विभागात गळीत हंगामाला गती आली असून आतापर्यंत १०१.५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. विभागाने साखर उत्पादनाचा एक कोटी क्विंटलचा टप्पा ओलांडला आहे.
सद्यस्थितीत कर्जत तालुक्यातील राशीन येथील इंडिकॉन (अंबालिका) कारखान्याने आतापर्यंत सर्वाधिक १३ लाख ५१ हजार ६२५ टन ऊस गाळप केले आहे. त्यापासून १० लाख ३४ हजार ९०० क्विंटल साखर उत्पादित करून आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. तर सहकारी साखर कारखानदारीत नेवासा तालुक्यातील भेंडा येथील मारुतराव घुले सहकारी साखर कारखान्याने भरारी घेतली आहे. या कारखान्याने ८ लाख ८४ हजार ३२० टन ऊस गाळप करून ८ लाख १० हजार ७०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
विभागातील अहिल्यानगर आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांत गाळप आणि साखर उत्पादनातही नेहमीप्रमाणे खासगी साखर कारखानेच आघाडीवर असल्याचे दिसते. अहिल्यानगरमध्ये १२ सहकारी, तर १० खासगी असे एकूण २२ कारखाने गाळप करत आहेत. नाशिक जिल्ह्यात सहकारी ३ आणि खासगी २ अशा एकूण पाच कारखान्यांकडून गतीने गाळप सुरू आहे. विभागाची गाळप क्षमता १,१९,४५० मे. टन असली तरी सध्या दररोज ७५,००० टन ऊस गाळप होत आहे.

















