अहिल्यानगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या २०२५- २६ या गळीत हंगामासाठी पहिल्या मिल रोलरचे पूजन माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. यावेळी उपाध्यक्ष पांडुरंग घुले, दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, संपत डोंगरे, सुधाकर जोशी, लक्ष्मण कुटे, इंद्रजित थोरात, डॉ. तुषार दिघे, विनोद हासे आदी उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री थोरात यांनी ऊस विकास मेळावे, एकरी उत्पादन वाढीचे प्रशिक्षण, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि योग्य नियोजन गरजेचे आहे, असे सांगत त्यांनी ८६०३२ या वाणाचा उल्लेख करत त्याच्या १२ ते १३ महिन्यांच्या चक्रावर भर देण्याचे सूचवले.
माजी मंत्री थोरात म्हणाले की, साखर कारखानदारीत प्रत्येक गाळप हंगाम आव्हानात्मक आणि कठीण असतो. व्यवस्थापन, अधिकारी, कर्मचारी आणि सभासद शेतकऱ्यांनी एकसंधपणे काम केल्यास यश मिळते.कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन वाढणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी प्रयत्न करावेत. यावेळी कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले की, कारखाना सक्षम चालवण्यासाठी ऊस उत्पादन वाढवणे आवश्यक आहे. यासाठी कारखान्यातर्फे अनुदान योजनांचा लाभ देण्यात येत आहे, सेंद्रिय खतही शेतकऱ्यांना पुरवले जात आहे. गाळपपूर्व तयारी अंतर्गत मशिनरी ओव्हर ऑइलिंग, ऊसतोडणी, वाहतूक, मजूर नियोजन ही कामे वेळेवर पूर्ण केली जातील. यावेळी नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले. पांडुरंग घुले यांनी आभार मानले.