कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने एआयचा वापर करून कामकाज अत्याधुनिक आणि सोपे कसे होईल यासाठी प्रयत्न करणार आहे. कारखान्याच्या वतीने मोबाईल ॲप तयार केलेले असून यातून शेतकऱ्यांना स्वतःच्या उसाची नोंद, उसाचे टनेज, उस पेमेंट व सवलतीची साखर इ. माहिती घरबसल्या समजणार आहे. ऊस उत्पादक शेतकरी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून उसाची नोंद स्वतः करू शकतील अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले. कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाची सांगता समारंभात ते बोलत होते.
आमदार काळे यांनी कारखान्याच्या गळीत हंगामाची माहिती दिली. ते म्हणाले की, ११३ दिवस चाललेल्या गळीत हंगामात ६ लाख ६५ हजार १३६ मे. टन उसाचे गाळप करून ७ लाख ५९ हजार ६७५ किंटल साखर पोती उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा ११.४१ टक्के मिळाला आहे. यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष प्रवीण शिंदे व गौरीताई शिंदे यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा करण्यात आली. संचालक दिलीपराव बोरनारे, सुधाकर रोहोम, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, सूर्यभान कोळपे, श्रीराम राजेभोसले, प्रवीण शिंदे, अनिल कदम, अशोक मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगझाप, वसंतराव आभाळे, डॉ. मच्छिंद्र बर्डे, वत्सलाबाई जाधव उपस्थित होते. प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी प्रास्तविक केले. संचालक सूर्यभान कोळपे यांनी आभार मानले.


















