अहिल्यानगर : मागील वर्षाच्या तुलनेत या गळीत हंगामात सोनई येथील मुळा साखर कारखान्याने एकशे आठ दिवसांत नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा ओलांडला आहे. बुधवारी (दि. २५) गळीत हंगाम सांगता कार्यक्रम माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत होणार आहे. गेल्या हंगामात ६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ५ लाख ४३ हजार साखर पोत्यांची निर्मिती झाली होती, तसेच अंदाजे एक कोटी लीटर इथेनॉल निर्मिती व वीज प्रकल्पात ४ कोटी ५१ लाख ७४ हजार युनिटची निर्मिती झाली होती.
कारखान्याने १०८ दिवसांत नऊ लाख ३ हजार ६६० मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. दिवसाला सरासरी आठ हजार ३६७ टनाप्रमाणे गाळप झाले. यावर्षी एक कोटी २५ लाख लोटर इथेनॉल निर्मिती होईल, असा अंदाज, अधिकाऱ्यांनी वर्तवला. कारखान्यांचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर म्हणाले कि, ‘मुळा’ने चांगल्या पद्धतीने गाळप केले. तब्बल सत्तर दिवस साडेनऊ हजार टन किंवा त्यापेक्षा जास्त उसाचे गाळप झाले आहे. किरकोळ तांत्रिक अडचण वगळता मोठी अडचण एकदाही आली नाही.


















