अहिल्यानगर : माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कमी खर्चात शेतकऱ्यांचे अधिक ऊस उत्पादन वाढावे याबाबत सातत्याने जनजागृती केली. त्याच पावलावर पाऊल ठेवत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सभासद शेतकऱ्यांचे उस उत्पादन वाढीसाठी कार्यक्षेत्रात धडक कार्यक्रम हाती घेऊन त्याबाबत शास्त्रोक्त माहिती देत आहेत. त्याच अनुषंगाने बारामती येथे राज्य सहकारी साखर संघ व बारामती कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने ऊस पिकासाठी ए-आय (कृत्रिम बुध्दिमत्ता ) प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना शेतकी विभागाच्या तीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत प्रशिक्षण घेतले.
राज्य सहकारी साखर संघाचे कार्यकारी संचालक संजय खताळ यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उदघाटन झाले. शिबिरात बारामती कृषी विज्ञान केंद्र मृदा शास्त्रचे विशेषज्ञ डॉ. विवेक भोईट यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, ऊस पिकात कृत्रिम बुध्दीमत्तेच्या वापरामुळे पारंपारीक पध्दती पिकापेक्षा फुटव्यांच्या संख्येत वाढ मिळते. ऊस कांड्यांची संख्या व लांबी वाढते, पानांची लांबी-रुंदी वाढते, उसाची जाडी व उंचीत वाढ मिळते या सर्व एकत्रीत बाबींमुळे पाण्यामध्ये ५० टक्के तर खतांमध्ये ३० टक्के बचत होऊन शेतकऱ्यांना हमखास १२० ते १५० मेट्रिक टन प्रति एकर ऊस उत्पादन मिळाले आहे. शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान किफायतशीर आणि हमखास उत्पादन वाढीसाठी मदत करते. ऊस पिकाची वाढ, त्याचे आरोग्य, कीड व रोग प्रार्दुभाव माहिती देण्यासाठी एआय सेन्सर्स व ड्रोनचा वापर करण्यात येतो. शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेजद्वारे कळविली जाते असेही ते म्हणाले.