अहिल्यानगर : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगामात गळितासाठी आलेल्या उसापोटी प्रतिटन दीडशे रुपये दराने दुसऱ्या हप्त्याची रक्कम आज ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली, तसेच ठिबक सिंचन अनुदानाची प्रतिटन शंभर रुपये प्रमाणे रक्कम अदा केली. दोन्ही मिळून १० कोटी ६४ लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या उसाला एकूण प्रतीटन २९५० रुपये भाव देण्यात आला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष व आमदार आशुतोष काळे यांनी दिली.
ते म्हणाले, नुकत्याच संपलेला गळीत हंगाम प्रतिकूल परिस्थितीत १२१ दिवस चालविला. गळीत हंगामात ६ लाख ५८ हजार ५०० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ७ लाख ३४ हजार ४५० क्विंटल साखर पोती उत्पादन झाले. पहिली उचल प्रतिटन २८०० रुपये यापूर्वीच अदा करण्यात आली. जून महिन्यामध्ये खरीप हंगामाची सुरुवात होते. बी-बियाणे आणि पेरणीचा खर्च असतो. मुलांच्या शाळा उघडल्याने वह्या-पुस्तके खरेदीसाठी आर्थिक हातभार आवश्यक असतो. हे लक्षात घेऊन उसाचा दुसरा हप्ता आणि ठिबक अनुदान शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले.
आमदार आशुतोष काळे म्हणाले कि, कर्मवीर शंकररावजी काळे यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांच्या हिताला सदैव प्राधान्य दिले. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान संचालक मंडळाने ही परंपरा कायम ठेवली. उसाला सातत्याने चांगला आणि बऱ्याचदा जिल्ह्यात सर्वाधिक भाव देण्यात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कायम आघाडीवर राहिला आहे. यंदा पाण्याची उपलब्धता चांगली राहणार असल्याने शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवडीस प्राधान्य द्यावे.