अहिल्यानगर : राहुरी येथे तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाच्या प्रचाराच्या सांगता सभा झाली. यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. कारखाना चालविण्याचे शिवधनुष्य अरुण तनपुरे यांनी उचलले आहे. जनसेवा मंडळाला सभासदांनी साथ द्यावी. सहकारमंत्री राष्ट्रवादीचे आहेत. कारखाना चालविण्यास अरुण तनपुरेच सक्षम असल्याचा दावा त्यांनी केला. तर शेतकरी विकास मंडळाच्यावतीने आयोजित सभेची सांगता झाली. यावेळी अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांनी तनपुरे परिवारामुळे कारखान्याचे वाटोळे झाले असा आरोप केला. ते म्हणाले, कारखाना चालविणे अवघड नाही. त्यासाठी पैसे उपलब्ध करण्याचे नियोजन केले आहे. शेतकरी विकास मंडळाला साथ द्या. शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उसाची मोळी गव्हाणीत टाकून कारखाना चालू करू. त्याच दिवशी शिवसेनेत प्रवेश करेन.
जनसेवा मंडळाच्या प्रचार सांगता सभेत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले की, मागील पंचवार्षिकमध्ये सत्ताधाऱ्यांना विरोधाला विरोध केला नाही. कारखान्याला अडचणीत आणले नाही. उलट दोन हंगामांत पुरेशी ऊसतोडणी यंत्रणा नव्हती. त्यावेळी प्रसाद शुगरतर्फे ऊस पुरवठा केला. प्रसाद शुगर नसता, तर शेतकऱ्यांचे हाल झाले असते. आता आमचे मंत्रिमंडळात चांगले संबंध आहेत. तसेच प्रसाद शुगरतर्फे तनपुरे कारखान्यास सर्वतोपरी मदत करील. यावेळी ज्येष्ठ सभासद सखाहरी काकडे, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, प्रेरणा समूहाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, शिवसेनेचे उबाठा गटाचे उत्तर जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, बाबासाहेब भिटे, सुनील अडसुरे, अनिल इंगळे आदी उपस्थित होते. शेतकरी विकास मंडळाच्या प्रचार सांगता सभेला माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेना राज्य प्रवक्ते संजीव भोर, शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव, जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, जयवंत पवार, आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संपत जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनराज गाडे, रासपाचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे, अॅड. भाऊसाहेब पवार, श्याम गोसावी, तालुका उपप्रमुख प्रशांत खळेकर, राजेंद्र गोपाळे उपस्थित होते.