पुणे : भीमाशंकर साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना ऊस पिकाचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे ऊस विकास अधिकारी सोमेश्वर दीक्षित यांनी दिली. चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे ऊस विकास शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. भीमाशंकर कारखान्याचे संचालक अंकित जाधव, दादाभाऊ पोखरकर, अरुण चासकर, बाजार समितीचे संचालक संदीप थोरात, चांडोली बुद्रुकचे सरपंच सोमनाथ केदारी, ऊस विकास अधिकारी दिनकर आदक आदी उपस्थित होते.
सोमेश्वर दीक्षित पुढे म्हणाले, शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने ऊस लागवड करणे अयोग्य आहे. नर्सरीतील रोपांचे बियाणे, सेंद्रिय खतांचा प्रमाणात वापर, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने विकसित केलेली औषधे व जैविके यांचा वेळोवेळी वापर केला पाहिजे. ऊस लागवड करताना माती तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. वारंवार उस पिके घेतल्याने उत्पादनात घट येत असल्याचे दिसून आले आहे. पिकांची फेरपालट केल्यास जमिनीचा सामू चांगला राहतो. नवीन एआय तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन देण्याचे काम कारखान्याचे कर्मचारी करतील, असे दीक्षित यांनी या वेळी सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना ज्येष्ठ संचालक दादाभाऊ पोखरकर यांनी उत्तरे दिली. तर कारखान्यामार्फत ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती दिनकर आदक यांनी दिली. कार्यक्रमाचे नियोजन कळंब गटप्रमुख महेंद्र वाळुंज, अक्षय शेळके, प्रवीण घेवडे, भास्कर सैद, नितिन कोल्हे यांनी केले. सूत्रसंचालन अशोक भोर यांनी तर आभार संदीप थोरात यांनी मानले.