कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीमुळे ऊस उत्पादनामध्ये वाढ व उत्पादन खर्चात बचत : आमदार राहुल आवाडे

कोल्हापूर : कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीमुळे ऊस उत्पादनामध्ये तीस टक्के वाढ व उत्पादन खर्चात चाळीस टक्के बचत होते. तर पाण्यामध्ये ठिबक सिंचनपेक्षा ३० टक्के जादा बचत होते. या आधुनिक प्रणालीचा वापर तळंदगे पाणीपुरवठा संस्थेच्या ४२० एकर क्षेत्रावर प्रभावीपणे करण्यात येणार आहे. एआय प्रणालीबाबतचे ज्ञान अवगत करून घेण्यासाठी पाणीपुरवठा संस्थेच्या सर्व ३६५ सभासदांना कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे प्रशिक्षणासाठी जवाहर कारखान्यातर्फे पाठवण्यात येईल, अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी दिली.

तळंदगे येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखाना व जवाहर सहकारी पाणीपुरवठा संस्था तळंदगेच्या संयुक्त विद्यमाने तळंदगे येथील विठ्ठल मंदिरात आयोजित ‘ऊस उत्पादनवाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर’ या चर्चासत्रात ते बोलत होते. आमदार आवाडे म्हणाले की, एआय तंत्रज्ञानाचा वापर करणारा व त्यासाठी अनुदान देणारा कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखाना राज्यातील पहिला कारखाना आहे. तळंदगेची जवाहर पाणीपुरवठा संस्था आदर्श व पथदर्शक संस्था म्हणून उदयास येण्यासाठी ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी नेहमीच सहकार्य केले आहे. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले, केन कमिटी अध्यक्ष दादासाहेब सांगावे, संचालक अण्णासाहेब गोटखिंडे, सूरज बेडगे, प्रकाश पाटील, माजी संचालक धनंजय मगदूम आदी उपस्थित होते. पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष सुरेश भोजकर यांनी स्वागत केले. सरव्यवस्थापक किरण कांबळे यांनी प्रास्ताविक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here