साखर कारखान्यांचा गाळप हंगाम कालावधी वाढविण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान उपयुक्त : बी. बी. ठोंबरे

पुणे : बारामतीचे अ‍ॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट,वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ आणि वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यासंदर्भात आयोजित चर्चासत्रात बोलताना वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले की, 2024-25 च्या गाळप हंगामाने राज्याचे साखर उद्योगाचे डोळे उघडलेले आहेत. यंदाचा गाळप हंगाम केवळ 83 दिवसात संपला. मागील हंगामात राज्यात 110 लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा आम्ही 80 लाख टन सुद्धा गाठू शकलो नाही. राज्यात 14 ते 15 लाख हेक्टर उसाचे क्षेत्र असूनही ९५० लाख टन ऊसदेखील उपलब्ध होऊ शकला नाही. महाराष्ट्राची सरासरी उत्पादकता प्रति हेक्टरी 72 टन मिळाली. बारामतीमध्ये कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान वापरून ८६०३२ जातीचे प्रति एकरी 150 टन झाल्याचे आम्ही पहिले. ऊस विकासाकडे आता अत्यंत गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. राज्यात सध्या सर्व कारखान्यांना मिळून प्रति दिन 8.50 लाख टन उसाची गाळपासाठी गरज आहे. किमान 150 दिवस कारखाने चालले तरच तग धरू शकतात. मात्र गाळपाचे दिवस कमी झाल्याने साखर कारखान्यांना प्रचंड तोटा होत आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान ऊस पिकासाठी नवसंजीवनी ठरणार आहे. यामुळे ऊस उत्पादन वाढून गाळप 180 ते 200 दिवस चालण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.

राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. म्हणाले कि, हे तंत्रज्ञान राज्यातील सर्व साखर कारखान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्य सहकारी बँकेचे विद्याधर अनास्कर म्हणाले की, साखर उद्योगाला कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान वापरासाठी मदत करेल. तत्पूर्वी, बारामती कृषी विकास केंद्राचे तज्ञ तुषार जाधव म्हणाले कि, दिवसेंदिवस कमी होत चाललेली जमिनीची सुपीकता, ऊस शेतीमध्ये होणारा पाण्याचा अतिरिक्त वापर, उसामधील साखरेचे कमी झालेले प्रमाण, ऊस तोडणीसाठी लागणारा 15 ते 16 महिन्याचा वेळ आणि उत्पादन खर्चात होत असलेली वाढ या सर्व समस्यांवर उपाय शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ भारतात आले. त्यामध्ये मायक्रोसॉफ्टने 71 शास्त्रज्ञ नेमले. जगविख्यात ऑक्सफर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सहभागी झाले. त्यातून कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. जाधव म्हणाले कि,महाराष्ट्राचे एकरी उत्पादन 35 ते 40 टन इतके आहे. ते उत्पादन 30 ते 40 टक्के वाढविण्याचे व्हिजन आम्ही ठेवले. त्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्डच्या सहायाने 250 कोटीच्या गुंतवणुकीतून ‘फार्म ऑफ द फ्युचर’ स्थापन करण्यात आले. अल्गोरिदम डॅश बोर्ड विकसित केला. आज देशभरातील शेतकरी अल्गोरिदमचा वापर करू शकतील. ऊस आणि साखर उत्पादन याचा अंदाज लावण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकेल.

यावेळी शेतकरी आष्टा (ता. वाळवा) संजीव माने, सुरेश चिंचवडे (मावळ, जि. पुणे) , महेंद्र तुकाराम थोरात (दौंड, पुणे) यांनी कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानामुळे ऊस शेतीमध्ये झालेल्या प्रगतीची माहिती दिली. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देण्यात आली. यावेळ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष व माजी कृषीमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री हसन मुश्रीफ, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, विद्याधर अनास्कर अ‍ॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे पदाधिकारी यांच्यासह विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, तज्ज्ञ व शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here