पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे विश्वस्त आणि कृत्रिम बुद्धीमत्ता समितीचे अध्यक्ष, आमदार जयंत पाटील म्हणाले कि, शेत्री क्षेत्राला क्रांतिकारी नवसंजीवनी बहाल करणारे तंत्रज्ञान म्हणून एआयकडे पहिले जाते. शेती क्षेत्रात भविष्यात कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान प्रचंड फायदेशीर ठरणार आहे. सध्या राज्यातील अनेक साखर कारखान्यांसमोर उसाच्या उपलब्धतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस टंचाईवर मात करणे शक्य आहे. त्यामुळे आगामी काळात या तंत्रज्ञानामुळे साखर उद्योगाची भरभराट होणार आहे. साखर कारखान्यांनी हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी घ्यावी. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपुरताच मर्यादित न ठेवता हे तंत्रज्ञान देशातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
बारामतीचे अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट,वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ आणि वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, यासंदर्भातील चर्चासत्र आयोजित करण्यात आले. आमदार पाटील म्हणाले कि, ‘व्हीएसआय’ ने पहिल्या 10 हजार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून इतर शेतकरीही मोठ्या प्रमाणात हे तंत्रज्ञान स्वीकारतील. या तंत्रज्ञानामुळे अत्यंत कमी खर्चात ऊस उत्पादनात 30 ते 45 टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे राज्यातील साखर उद्योगाची आणखी भरभराट होण्यास मदत होणार आहे. राज्य सरकार ने ही एआय तंत्रज्ञानासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. प्रारंभी व्हीएसआय आणि बारामतीचे अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्यात ऊस उत्पादन वाढीसाठीकृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि प्रसार सामंजस्य करार झाला. या करारावर बारामतीचे अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे आणि शंकरराव मगर तर ‘व्हीएसआय’कडून विश्वस्त जयंत पाटील महासंचालक संभाजी कडू- पाटील यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेवरील माहिती पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष व माजी कृषीमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, विद्याधर अनास्कर अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे पदाधिकारी यांच्यासह विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, तज्ज्ञ व शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत.