बांगलादेश : वर्षभरात चितगाव बंदरातून रिफाईंड साखरेची आयात झाली दुप्पट

ढाका : आयात शुल्क कपातीमुळे गेल्यावर्षी चितगाव बंदरातून शुद्ध (रिफाईंड) साखरेची आयात जवळजवळ दुप्पट झाल्याचे वृत्त बिझनेस स्टँडर्डने अधिकृत आकडेवारी आणि उद्योगातील सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. या वाढीमुळे देशांतर्गत साखर शुद्धीकरण कंपन्यांसमोर आव्हाने वाढली आहेत. काहींनी कच्च्या साखरेच्या आयातीमध्ये २० टक्यांपेक्षा जास्त घट झाल्याचे सांगितले आहे. आर्थिक वर्ष २४-२५ मध्ये, चितगाव बंदरातून रिफाईंड साखरेची आयात गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास ९६ टक्के वाढून २,६८,३८० टन झाली. गेल्यावर्षी १,३६,९८० टन आयात झाली होती.

उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, आयात शुल्क कमी करण्याच्या सरकारने घेतलेल्या पावलामुळे आणि एस. आलम ग्रुप आणि देशबंधू ग्रुप यांसारख्या प्रमुख स्थानिक रिफायनर्सनी कच्च्या साखरेच्या आयातीत कपात केल्याने ही तीव्र वाढ झाली आहे. याव्यतिरिक्त, विशेषतः अन्न आणि पेय, औषधनिर्माण आणि दुग्धजन्य क्षेत्रातील मोठे औद्योगिक वापरकर्ते आता थेट रिफाइंड साखर आयातीचा पर्याय स्वीकारत आहेत.

चितगाव येथील अल्बियन लॅबोरेटरीज लिमिटेडचे अध्यक्ष रईसुल उद्दीन सैकत यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून आम्ही स्थानिक पातळीवर साखरेचा पुरवठा करत आहोत. परंतु २०२५ च्या सुरुवातीपासून आम्ही थेट रिफाइंड साखर आयात करण्यास सुरुवात केली आहे. त्याची किंमत जवळजवळ देशांतर्गत उपलब्ध असलेल्या साखरेइतकीच आहे, असे असे द बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तामध्ये म्हटले आहे. तर मेघना ग्रुपचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक मिजानुर रहमान यांनी शुल्क कपातीचा परिणाम झाल्याबाबत दुजोरा दिला. रिफाइंड साखर आयात वाढण्याचे एक मुख्य कारण म्हणजे कमी आयात शुल्क हेच आहे.

सरकारने रिफाइंड साखरेवरील आयात शुल्क ६,००० रुपये प्रति टनावरून ४,००० रुपये प्रति टन केले, तर कच्च्या साखरेवरील शुल्क ३,००० रुपये प्रति टनच राहिले. या धोरणात्मक बदलामुळे रिफाइंड साखरेच्या आयात मूल्यात लक्षणीय वाढ झाली. ही वाढ आर्थिक वर्ष २०२४ मधील १,११४.०७ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२५ मध्ये २,२०३.५६ कोटी रुपये झाली. ही वाढ ९७.७९ टक्के आहे. सीमाशुल्क महसूलदेखील ५८.३३ टक्यांनी वाढून ५८७.२७ कोटी रुपयांवरून ९२९.८२ कोटी रुपये झाला.

दरम्यान, रिफाइंड साखर आयातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने स्थानिक रिफायनरीजसाठी समस्या निर्माण झाल्या आहेत. बांगलादेश शुगर रिफायनर्स असोसिएशनच्या मते, देशाची वार्षिक साखरेची मागणी सुमारे २० लाख टन आहे. ती जवळजवळ पूर्णपणे आयातीद्वारे पूर्ण केली जाते. सिटी ग्रुप, मेघना ग्रुप, बसुंधरा ग्रुप, टीके ग्रुप, एस. आलम ग्रुप आणि देशबंधू ग्रुप यांसारख्या प्रमुख कंपन्या पारंपरिकपणे ब्राझील, अर्जेंटिना आणि भारतातून रिफायनिंग आणि वितरणासाठी कच्ची साखर आयात करतात.

तथापि, आता परिस्थिती बदलत आहे. सिटी ग्रुपचे संचालक विश्वजित साहा म्हणाले की, आमच्या कच्च्या साखरेच्या आयातीत फक्त एका वर्षात सुमारे २० टक्के घट झाली आहे. रिफाइंड साखरेचे औद्योगिक आयातदार – जर ते उत्पादक असतील तर कच्च्या मालाच्या आयातीवर व्हॅट सूट मिळवू शकतात. त्यामुळे त्यांना देशांतर्गत रिफायनरीजपेक्षा किंमत वाढवता येते, असे ते म्हणाले. चितगाव कस्टम्स हाऊसचे प्रवक्ते सैदुल इस्लाम यांनी यास दुजोरा दिला. ते म्हणाले की, उत्पादक कंपन्या कच्च्या मालावर व्हॅट सूट मिळण्यास पात्र आहेत. हा फायदा पेये आणि औषध कंपन्यांनादेखील लागू होतो, जसा तो रिफायनिंग कंपन्यांना लागू होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here