नवी दिल्ली : ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आगामी गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून मिळणाऱ्या उसाच्या दरात ३.३ टक्क्यांची वाढ होऊ शकते.
याबाबत द हिंदू बिझनेस लाइनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कृषी खर्च आणि दर आयोगाने (CACP) ऊसाचा योग्य आणि लाभदायी दर (एफआरपी) २०२३-२४ या हंगामासाठी १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी ₹३१५/क्विंटल दिला गेला पाहिजे अशी शिफारस केली आहे. सध्या हा दर ₹३०५ प्रती क्विंटल आहे.
प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, कॅबिनेट या महिन्यात FRP वर निर्णय घेऊ शकते. जेवढा जास्त उतारा मिळेल, तेवढाच उसाचा दर जादा असेल.
केंद्र सरकारसाठी FRP बाबतचा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भूमिका खूप महत्त्वाची असेल. शेतकऱ्यांना उसाचे लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी FRP वाढवून प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न आहेत. यासोबतच, इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) च्या म्हणण्यानुसार, चालू हंगामात (ऑक्टोबर-सप्टेंबर) साखर उत्पादन घटून ३२.८ मिलियन टन (mt) होईल अशी शक्यता वर्तवली आहे.
अलिकडेच इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (ISMA) सुद्धा सरकारकडे FRP च्या अनुरूप साखरेचा किमान विक्री दर (MSP) ३१ रुपये प्रती किलो (३१,००० रुपये प्रती टन) या सध्याच्या स्तरावरुन वाढवून ३८ रुपये प्रती किलो (३८,००० रुपये प्रती टन) करण्याची मागणी केली आहे. अन्न मंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात ISMA चे अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला यांनी सांगितले की, सरकारने पहिल्यांदा ७ जून २०१८ रोजी साखरेची एमएसपी २९ रुपये प्रती किलो निश्चित केली होती. वर्ष २०१८-१९ मध्ये एफआरपी वाढवून २७५० रुपये प्रती टन आणि साखरेची एमएसपी १४ फेब्रुवरी २०१९ रोजी वाढवून ३१ रुपये करण्यात आली आहे. एफआरपीमध्ये खूप वाढ झाल्यानंतरही २०१८-१९ मध्ये MSP मध्ये काहीच वाढ झालेली नाही.















