केंद्र सरकारकडून २०२५-२६ हंगामासाठी मक्यासह १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने २०२५-२६ च्या हंगामासाठी मक्यासह १४ खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्यास मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य किंमत मिळावी यासाठी सरकारने २०२५-२६ च्या खरीप हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली आहे.

केंद्र सरकारने सोयाबीनच्या हमीभावात ४३६ रुपयांची वाढ केली. तर कापसाच्या हमीभावात ५८९ रुपयांची वाढ केली. त्यामुळे खरिप हंगाम २०२५-२६ मध्ये सोयाबीनला ५ हजार ३२८ रुपये हमीभाव असेल. तर लांब धाग्याच्या कापसाला ८ हजार ११० रुपये हमीभाव मिळणार आहे. तुरीच्या हमीभावातही ४५० रुपयांची वाढ करण्यात आली. तुरीचा हमीभावही ८ हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आला. मक्याच्या हमीभावातही १७५ रुपयांची वाढ करण्यात आली. मक्याचा हमीभाव आता २४०० रुपये झाला आहे. ज्वारीच्या हमीभावातही ३२८ रुपयांची वाढ करण्यात आली. हायब्रीड ज्वारीला आता ३ हजार ६९९ रुपये हमीभाव असेल. तर मालदांडी ज्वारीला ३ हजार ७४९ रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला.

हमीभाव वाढीविषय़ी माहिती देताना केंद्रीय माहीती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेऊन हमीभाव जाहीर केली आहे. हमीभाव ठरवताना कृषी किंमत व मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव जाहीर केला आहे. यामध्ये मागणी आणि पुरवठा, देशांतर्गत मागणी, जागतिक बाजारभाव, जागतिक बाजारातील घडामोडी, तसेच पाणी, जमीन यांचा विचार करून आयोगाकडून शिफारस केली जाते.

(Source : PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here