छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत बिल मिळावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. गुरुवारपासून शेतकरी उपोषणाला बसले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात उसाचे बिल १५ टक्के व्याजासह वर्ग करावे अशी मगाणी करण्यात आली आहे. या मागण्यांसाठी २६ मे रोजी निवेदन देऊनही न्याय न मिळाल्याने उपोषणाची वेळ आल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव (माउली) पाटील मुळे यांनी सांगितले.
पैठण तालुक्यातील कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांना उसाची बिले दिली नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी बी-बियाणे व खते खरेदी करता येत नाहीत. शेतकऱ्यांचे थकित ऊस बिल तत्काळ बँक खात्यावर वर्ग करावे व दोषी कारखाना प्रशासनावर कारवाई करावी, अशी मागणी आहे. याचबरोबर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावा, अवकाळी पाऊस, वादळाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई, कृषी विभागाकडून महाडीबीटी बंद करण्यात आली आहे ती तत्काळ सुरू करून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ द्यावा, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.