रायपूर : कवर्धा येथील भोरमदेव सहकारी साखर कारखान्याच्यावतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोनस जाहीर करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि शेतकरी-अनुकूल दृष्टिकोनामुळे हे यश मिळाले आहे. कारखाना व्यवस्थापनाने गेल्या गळीत हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना ११.०९ कोटींचा बोनस दिला आहे. कारखान्याच्यावतीने शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन वेळेवर पेमेंट आणि बोनस वितरण सुनिश्चित केले गेले आहे असे सांगण्यात आले.
भोरमदेव सहकारी साखर कारखानान्याने २०२४-२५ च्या गळीत हंगामात शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या उसासाठी एकूण ११५.४४ कोटी रुपयांचे पेमेंट दिले आहे. त्यामुळे कारखाना राज्यातील सर्व साखर कारखान्यांमध्ये आघाडीच्या स्थानावर आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना बोनस मिळाल्याने जिल्ह्यातील शेतकरी समुदायात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांच्या विशेष पुढाकार आणि प्रयत्नांमुळे हे बोनस पेमेंट शक्य झाले असे सांगण्यात आले. या बोनसमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती तर मजबूत होईलच, शिवाय शेतकऱ्यांचा आत्मविश्वासही वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.