पुणे : ऊस पिकासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये कर्ज देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. तसेच कर्जाची वेळेत परतफेड केली नाही, तर १२ टक्के व्याज आकरण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी ठिबक ऊसासाठी १० हजार बिनव्याजी कर्ज देणार असल्याचेही सांगितले. ते म्हणाले, ऊस पिकातील कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी हेक्टरी २५ हजार रुपये देणार आहोत. त्यामध्ये ठिबकवर ऊस असेल तर कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी हेक्टरी १० हजार रुपये बिनव्याजी कर्ज देणार आहोत. ९ हजार रुपये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि उर्वरित रक्कम कारखाना देईल, असे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी, राज्यातील ऊस शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी ६ टक्के व्याजदराने राज्य सहकारी बँक ५०० कोटी रुपये साखर कारखान्यांना देणार असल्याचं महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितले. त्याबाबत बोलताना पवार म्हणाले कि, या निधीचा वापर कृत्रिम बुद्धिमत्तेसाठीच झाला पाहिजे अन्यथा कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एआयसाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्याचा आजच शासन निर्णय काढणार स्पष्ट केले.
प्रारंभी, व्हीएसआय आणि बारामतीचे अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्यात ऊस उत्पादन वाढीसाठीकृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि प्रसार सामंजस्य करार झाला. या करारावर बारामतीचे अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे आणि शंकरराव मगर तर ‘व्हीएसआय’कडून विश्वस्त जयंत पाटील महासंचालक संभाजी कडू- पाटील यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेवरील माहिती पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष व माजी कृषीमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, विद्याधर अनास्कर अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे पदाधिकारी यांच्यासह राज्यातील विविध साखर कारखान्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, तज्ज्ञ व शास्त्रज्ञ उपस्थित होते.