इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दरवाढीसाठी प्रयत्न : केंद्रीय मंत्री प्रल्हाद यांची ग्वाही

नवी दिल्ली : इथेनॉल मिश्रणाचे सध्या असलेले प्रमाण वाढविण्यासाठी आणि इथेनॉलच्या दरवाढीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिले. साखर उद्योग क्षेत्रात बारा महिने रोजगारनिर्मिती करण्यासाठी ‘बिझनेस मॉडेल’ तयार व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देशातील सर्व २६० सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यांतील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांना तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, कमाल ऊस गाळप, सर्वोत्तम साखर उतारा अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल २०२३-२४ या वर्षासाठीच्या दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या गुणवत्ता पारितोषिकांचा वितरण समारंभ दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेन्टर येथे गुरुवारी पार पडला. त्या वेळी मंत्री जोशी बोलत होते.

देशभरातील सहकारी साखर कारखान्यांचे चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक, साखर आणि जैव-ऊर्जा क्षेत्रातील सर्व प्रमुख भागधारक आणि साखर उद्योगाशी संबंधित तज्ज्ञ मंडळी तसेच देशभरातील संपूर्ण साखर उद्योगाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारितोषिक वितरणाच्या मुख्य कार्यक्रमात मंत्री श्री जोशी यांनी, सहकार क्षेत्राचे महत्त्व, त्यामुळे शेती आणि शेतकऱ्याच्या आयुष्यात झालेला मोठा बदल आणि भविष्यातील आव्हानांकडे लक्ष वेधले. सहकार क्षेत्राचे व्यापक हित लक्षात घेऊन मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाकडे लक्ष वेधत असतानाच त्यांनी मोदी सरकार येण्यापूर्वी असलेले इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, एफआरपी, साखर निर्यात, साखरेची विक्री किंमत आणि त्यात झालेली वाढ झाली यांची तुलनात्मक आकडेवारी सादर केली. या वेळी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री निबूबेन बांधनिया, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते विजेत्या सहकारी साखर कारखान्यांना गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्यात आले.

मोदी सरकारने शेतकरी, सहकारी साखर कारखाने आणि सहकार क्षेत्राच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांबद्दल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी प्रास्ताविकात आभार मानले. उसाची एफआरपी वाढत असताना साखरेची विक्री किंमतसुद्धा वाढविण्यात यावी, ऊस उत्पादक शेतकऱ्याला आर्थिक ताकद दिली जात असताना कारखान्यांनाही बळ मिळाले पाहिजे आणि त्यासाठी साखरेचे विक्री दर वाढणे आवश्यक आहे. इथेनॉल उत्पादनासाठी कारखान्यांनी मोठी आर्थिक गुंतवणूक केली असून इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ व्हावी, असे श्री. पाटील म्हणाले. सूत्रसंचालन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे सचिव सुमित झा यांनी केले. हर्षवर्धन पाटील आणि महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी स्वागत केले.

१० पारितोषिकांसह महाराष्ट्र प्रथम

२०२३-२४ साठीच्या एकूण २५ गुणवत्ता पारितोषिकासाठी देशभरातून १०३ सहकारी साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा होती. यात महाराष्ट्राने एकूण १० पारितोषिके मिळवून प्रथम क्रमांक, तर तमिळनाडूने पाच पारितोषिकांसह दूसरा क्रमांक पटकावला. गुजरात, उत्तर प्रदेशने चार पारितोषिके मिळविली. पंजाब, हरियाना मध्य प्रदेश आणि उत्तराखंडला प्रत्येकी एक पुरस्कार मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here