पुणे : साखर उद्योग निर्मितीत अग्रगण्य असलेल्या एस. एस. इंजिनियर्सचे साखर कारखाने उभारणीत मोठे योगदान आहे. या कंपनीने महाराष्ट्रा बरोबरच उत्तर प्रदेश, गुजरात आणि पंजाब या ठिकाणी साखर कारखाने उभारून शेतकऱ्यांना आणि तेथील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. अलिकडेच पंजाब सरकारने एस. एस. इंजिनियर्सकडून पंजाबमधील बटाला आणि गुरुदासपूरजवळ बटाला सहकारी साखर कारखाना आणि गुरुदासपूर सहकारी साखर कारखाना उभारणीचे काम पूर्ण करून घेतले आहे. तेथे गेल्या मागील २ वर्षापासून साखर आणि वीज निर्मिती सुरू झाली आहे. या भागातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्रीताली साखर उद्योगाचा दौरा केला. यावेळी येथील प्रगत ऊस शेती पाहून भारावलेल्या शेतकऱ्यांनी हे ऊस संगोपन मॉडेल आपल्या राज्यात राबवण्याचा संकल्प केला.
एस. एस. इंजिनिअर्सचे संस्थापक शहाजीराव भड यांनी हा अभ्यास दौरा आयोजित केला होता. त्यांनी बटाला आणि गुरुदासपूर त्याचप्रमाणे पंजाबमधील इतर साखर कारखान्यांचे प्रत्येकी दोन अशा एकूण २० शेतकऱ्यांचा महाराष्ट्र अभ्यास दौरा नुकताच आयोजित केला होता. या शेतकऱ्यांनी माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना आणि त्या परिसरातील एकरी १०० टनांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी लागवड केलेल्या पाच ठिकाणी भेटी दिल्या. यामध्ये टेंभुर्णी, भोसे, जालाली, करकंब या ठिकाणी ऊस वाण को ८६०३२ आणि कोएम ०२६५ ऊस वाणांच्या प्लॉटची पाहणी केली. यावेळी ऊस संजीवनी ग्रुपचे प्रमुख कृषिभूषण संजीव माने, ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. सुरेश पवार, कारखान्याचे व्हॉइस चेअरमन, चेअरमन आणि संचालक उपस्थित होते.


















