कोल्हापूर विभागातील शेतकऱ्यांना एफआरपीच्या थकीत ७२ कोटींची प्रतीक्षा

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांकडे ७२ कोटी ६३ लाख ७३ रुपये शेतकऱ्यांचे थकीत असून ही रक्कम लवकर मिळावी, अशी मागणी होत आहे. मान्सूनपूर्व पावसामध्ये झालेल्या नुकसानीमुळे हवालदिल झालेला शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतीचा हंगाम सुरू झाला असून या कामासाठी पैशाची जुळवाजुळव करताना त्याची दमछाक होत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांची थकलेली एफआरपीदेखील देण्याचे नाव साखर कारखाने घेईनात. त्यामुळे शेतकऱ्यांची फरफट सुरू आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाच्या बिलासाठी कायदा करूनही प्रतीक्षा करावी लागते. त्यासाठी आंदोलन करावे लागते. ही वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये म्हणून एफआरपीचा कायदा करण्यात आला, तरीदेखील शेतकऱ्याला त्याच्या उसाचे बिल वेळेत मिळत नाही. गेल्या गळीत हंगामात शेतकऱ्यांनी घातलेल्या उसाची एफआरपीची पूर्ण रक्कम अद्याप कोल्हापूर विभागातील सोळा साखर कारखान्यांनी दिलेली नाही.

मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरिपाची तयारी सुरू असतानाच पावसाने झोडपण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी खरिपाची तयारी झालेली आहे. बी-बियाणे, खते, औषधे यासाठी शेतकऱ्याला आता पैशाची गरज असताना शेतकऱ्यांकडे मात्र हातात सध्या काहीच नाही.एफआरपीची रक्कम मिळेल असे वाटत होते; परंतु अजूनही ती मिळालेली नाही. थकीत एफआरपी असलेल्या कारखान्यांमध्ये यावर्षी दरात अग्रेसर आणि साखर उद्योगात नाव असलेल्या काही साखर कारखान्यांचा समावेश आहे. पैसे नसल्यामुळे शेतकरी सावकारीकडे वळू लागला आहे.

एफआरपी वेळेवर देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने स्पष्ट आदेश दिले असतानाही कारखान्यांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. बहुतांश साखर कारखानदार सत्तेत असल्यामुळे कारवाईसाठी त्यांच्या दारातदेखील कारखान्याची यंत्रणा जाऊ शकत नाही. ऊस दिला; परंतु बिल न मिळाल्याने शेती करायची कशी, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here