पुणे : उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी व खर्च कमी करण्यासाठी ‘एआय’ हा नवीन पर्याय आला असून, शेतकऱ्यांनी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे, असे मत बारामती ॲग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले. पवार म्हणाले, बारामती ॲग्रोच्या वतीने देशात प्रथमच शेतकऱ्यांसाठी एआय तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घेण्याची गरज आहे.
सणसर येथे बारामती ॲग्रोच्या वतीने आयोजित पीक परिसंवाद मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी श्री छत्रपती कारखान्याचे संचालक गणपतराव कदम, इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक अमोल भोईटे, श्रीनिवास कदम, हिंदुराव भोईटे, दत्तात्रय निंबाळकर, हेमंत निंबाळकर, नेताजी रायते, सुनील काळे व शेतकरी उपस्थित होते. बारामती कृषी विज्ञान केंद्राचे मातीपरीक्षण विभागाचे प्रमुख डॉ. विवेक भोईटे, ऊसविकास अधिकारी प्रवीण भापकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.