पुणे : देशात यंदा ऊस लागवड क्षेत्रात वाढ होताना दिसत असली तरी बहुतांशी राज्यातील ऊस पट्ट्यात यंदा जादा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः जर हंगाम सुरू होण्यापूर्वी सातत्याने परतीचा पाऊस झाल्यास त्याचा प्रतिकूल परिणाम उसाच्या वाढीवर होवू शकतो. यामुळे क्षेत्र जास्त असले म्हणून ऊस व साखरेचे उत्पादन वाढेल याची शाश्वती देता येणार नाही, असे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे. त्यांच्या अनुमानानुसार, महाराष्ट्र व कर्नाटकातील ऊस लागवडी वाढल्या असल्या तरी आगामी पावसावरच पुढील हंगामातील साखर उत्पादनाचे गणित अवलंबून आहे. सरत्या हंगामामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक लागवड असूनही लाल सड रोगामुळे उसाच्या व पर्यायाने साखरेच्या उत्पादनात मोठी घट आली होती. तर महाराष्ट्र, कर्नाटकात हंगाम सुरू होण्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने उसासह साखरेचे उत्पादन व उताराही घटला.
सद्यस्थितीत देशातील आघाडीच्या तीन राज्यांपैकी महाराष्ट्र व कर्नाटकात ऊस लागवड वाढली आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये थोडी घट झाली आहे. बिहार, गुजरात, तमिळनाडू आणि हरियानामध्येही उसाच्या लागवडीत किरकोळ घट नोंदवली गेली आहे. देश स्तरावर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत, ऊस लागवडीखालील क्षेत्र ५३.१० लाख हेक्टर होते, जे गेल्या वर्षीच्या ५३.४० लाख हेक्टरपेक्षा किंचित कमी आहे. तर देशातील सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये ८ मे पर्यंत उसाचे क्षेत्र २७.९० लाख हेक्टरवर ऊस लागवड होती, कृषी मंत्रालयाच्या २०२४-२५ च्या अंतिम एकरी क्षेत्राच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात २६.५० लाख हेक्टरवरून २५.९० लाख हेक्टरपर्यंत घट झाली आहे. महाराष्ट्रात ११.५० लाख हेक्टरवर ऊस लागवड आहे. गेल्या वर्षी ही लागवड १०.५० लाख हेक्टरवर होती. यंदा उत्तर प्रदेश वगळता अन्य ऊस उत्पादक राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगली ऊस लागवड नोंदवली गेली आहे.