कोल्हापूर : गेल्यावर्षी गळीत हंगाम सुरू होण्याआधी झालेल्या ऊस आंदोलनादरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने ठरल्याप्रमाणे प्रती टन १०० रुपये व ५० रुपये दुसरा हप्ता देण्याच्या कारखान्यांच्या प्रस्तावांना मान्यता द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी गुरुवारी केली. याबाबत शेट्टी यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची कोल्हापूरमध्ये भेट घेतली. काही कारखान्यांनी शासनाकडे सादर केले आहेत. या प्रस्तावांना मान्यता देवून शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्याची मागणी शेट्टी यांनी केली आहे.
शेट्टी म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. शासनाने अद्याप पंचनामे केलेले नाहीत. त्यामुळे तातडीने पंचनामे करावेत. शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, आजरा, चंदगड, गडहिंग्लज या तालुक्यातील ऊसासह अन्य पिके पाण्याविना करपली आहेत. त्याबाबत सरकारने उपाययोजना करावी अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आचारसहिंता संपल्यानंतर मुख्य सचिवांना भेटून तातडीने या प्रस्तावांना मान्यता देवून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार असल्याचे सांगितले.


















