सांगली : वाळवा तालुक्यातील साखराळे येथील शेतकरी विनोद राजाराम बाबर यांनी गेल्या सहा वर्षांपासून लागवडीच्या उसाचे एकरी १०० टनापेक्षा अधिक तर खोडव्याचे ६५ ते ७० टनांचे उत्पादन मिळवले आहे. कृषी तज्ज्ञांकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनातून शेतीत बदल, लागवडीसाठी पाच फूट सरीचा वापर, सेंद्रीय शेती पद्धती, रोपनिर्मितीकडे कल, ऊस व्यवस्थापन यातून त्यांनी ही झेप घेतली आहे. विनोद यांनी मागील वर्षी लागवडीच्या उसाचे एकरी ११७ टन ५३४ किलो उत्पादन मिळवले. तर त्या मागील वर्षी एकरी १०५ टन तर २०२१ मध्ये १२४ टन ४३ किलो उत्पादन घेतले. यासाठी त्यांना एकरी एक लाखापर्यंत उत्पादन खर्च येतो आणि कारखान्याकडून प्रति टन ३२०० दर मिळतो. आता पुढील हंगामात एकरी १४० टन उत्पादनाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
साखराळेत राज्यातील प्रसिद्ध राजारामबापू सहकारी साखर कारखाना आहे. याच गावातील विनोद राजाराम बाबर यांची साडेपाच एकर माळरान मध्यम शेती आहे. पूर्वी त्यांची द्राक्ष बाग होती. आज ऊस हे मुख्य पीक आहे. लहान वयात शेतीच्या जबाबदारीमुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. त्यांनी बहीण- भावांचे शिक्षण जिद्दीने पूर्ण केले. शेतीतील शिक्षणाचा मात्र त्यांनी ध्यास घेतला. उसाची शास्त्रीय शेती करायची, उत्पादकता वाढवायची असे पक्के ठरवले. आष्टा येथील सुरेश कबाडे उसातील प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत. विनोद यांनी त्यांचे मार्गदर्शन घेतले. २०११ मध्ये त्यांनी एकरी शंभर टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले. लागवडीसाठी अनुभवातून पाच फूट सरीचा वापर निश्चित केला. त्यातून खते, पाणी यांचा योग्य वापर होण्यासह त्यांची बचत होते. पिकाला सूर्यप्रकाश चांगला मिळतो. उसाची संख्या, पानांची रुंदी चांगली राहते. शेतीतील कष्ट कमी होऊन आंतरमशागतही करणे सोपे होते असा त्यांचा अनुभव आहे. आता त्यांचा कल रोप निर्मितीकडे आहे.