पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अख्ख्या राज्याने शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार असा संघर्ष बघितला. लोकसभेच्या रणांगणात थोरले पवार म्हणजेच शरद पवार यांनी बाजी मारली तर विधानसभेच्या रणांगणात धाकटे पवार अर्थात अजित पवार यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवल्याचे आपल्याला दिसले. त्यानंतर मात्र हे दोन्ही गट थेट कुठल्याच निवडणुकीत समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले नाही. सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना पहायला मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती, पण शरद पवार गटाने निवडणुकीतून अर्ज मागे घेतल्याने तो सामना टळला.माळेगाव साखर कारखान्याच्या रणांगणात मात्र पवार विरुद्ध पवार लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘ब’ वर्ग संस्था मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वाना चकित केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः शड्डू ठोकल्याने ही निवडणूक रंगतदार होणार हे अगोदरच स्पष्ट झाले आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी मोट बांधण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी त्यांनी सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी (ता. ३०) दुपारी ४ वाजता बारामतीत आयोजित केला आहे.
माळेगाव कारखाना निवडणुकीसाठी ५९३ जणांनी अर्ज भरले आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पन्नासपेक्षा अधिक जणांचे अर्ज आहेत. याशिवाय इतर पक्षाच्या इच्छुकांनीही युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची तयारी दर्शविली आहे. सहा गटातून पुरेसे व तुल्यबळ अर्ज आल्याने आम्हीसुद्धा सत्ताधाऱ्यांना पर्याय होऊ शकतो. सभासदांचा आम्हाला पाठिंबा आहे. या लढतीची रूपरेषा निश्चित करण्यासाठी अधिकाधिक कार्यकर्त्यांनी व सर्वपक्षीय उमेदवारांनी मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाचे तालुकाध्यक्ष अॅड. एस. एन. जगताप, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश खोमणे यांनी केले आहे.
माळेगाव कारखान्यासाठी शरद पवार गटानेही शड्डू ठोकल्याने अजित पवार, बाळासाहेब तावरे- रंजन तावरे गट आणि कष्टकरी शेतकरी संघटना अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. ऐनवेळी कोण कोणाशी आघाडी करणार आणि कोण माघार घेणार, यावर लढतीचे बरेचसे चित्र अवलंबून असणार आहे. दि. २९ मे ते १२ जून उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. (दि.१३) जून रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे. माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.