सांगली : सर्वोदय साखर कारखाना परत देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना किती पैसे पाहिजेत, त्यांनी सांगावेत. मी त्यांना पैसे द्यायला तयार आहे, अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना थेट सवाल केला. चंद्रकांत पाटील यांनी पृथ्वीराज पवार यांच्या संपर्क कार्यालयास भेट देऊन दिवंगत माजी आमदार संभाजी पवार यांना अभिवादन केले. आप्पांच्या काळातील आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी जयंतरावांना सर्वोदय कारखानाप्रकरणी आव्हान दिले.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, हा खूप जुना तिढा आहे, जो आम्ही कायदेशीर मार्गाने २०१४ ते २०१९ भाजपच्या सत्ताकाळात सोडवत आणला होता. कारखाना सभासदांच्या ताब्यात आला होता, गाळप परवानाही देण्यात येणार होता; मात्र तोवर महापूर आला. पुढे काही काळात सत्ता बदलली. जयंतरावांनी सत्तेचा गैरफायदा घेत कागदपत्रांत पुन्हा फेरबदल केले. मंत्री पाटील म्हणाले, आमची सत्ता आहे, योग्य आणि न्याय बाबी होतील. जयंतरावांना आम्ही पैसे द्यायला तयार आहोत, त्यांनी सांगावे किती पैसे द्यायचे. मी ते द्यायला तयार आहे.