नवी दिल्ली : इथेनॉलमध्ये स्वदेशी आणि स्वच्छ ऊर्जा स्त्रोताच्या रुपात भारतामध्ये जबरदस्त क्षमता आहे असे टोयाटोने म्हटले आहे. यातून जीवाश्म इंधनाचा खप, ऊर्जा आयात बिल आणि कार्बन उत्पादन यामध्ये घट होऊ शकेल. इथेनॉलच्या अधिकाधिक वापरामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, नव्या रोजगारांची निर्मिती होईल. त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. यासोबतच अतिरिक्त साखर आणि अन्नधान्यामुळे सरकारच्या महसुलात वाढ होणार आहे.
टोयोटाने मंगळवारी भारतामध्ये फ्लेक्सी-फ्यूल स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेइकल्सबाबतचा आपला पायलट प्रोजेक्ट लॉन्च केला. यापूर्वी आपल्या प्रगत स्ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रासोबत इथेनॉलला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जागरुकता वाढविण्यासाठी कंपनीने पावले उचलली होती.
टोयोटाने सांगितले की, भारताने आपल्या उद्दीष्टापूर्वी १० टक्के इथेनॉल मिश्रणाचा टप्पा गाठला आहे. तर २०२५-२६ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणातून ८६ मिलियन बॅरल पेट्रोलचा वापर कमी होईल. यातून भारतासाठी ३०,००० कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत होणार आहे. आणि यासोबत १० मिलियन टन कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मदत मिळेल.















